Wednesday, April 13, 2011

शांतता प्रेमी पुणेकरांचा एकता मेळावा - जाहीर निमंत्रण


शांतता प्रेमी पुणेकरांचा एकता मेळावा
जाहीर निमंत्रण

आपल्या पुणे शहरामध्ये विविध धर्माचे लोक नांदत आहेत. या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. पुण्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा आपण धैर्याने मुकाबला केला आहे. सुमारे पन्नास वर्षापूर्वी पानशेतच्या पुरामुळे पुण्यावर संकट ओढवले. यावेळीही पुणेकर निर्धाराने उभे राहिले.

लकडी पुलाजवळ (संभाजी पूल) मंदिर व मस्जीत शेजारी शेजारी होती. पुरामध्ये सर्व वाहून गेले. इतर इमारती व मंदिर काही काळाने उभे राहिले. पण मशिदीच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया राजकारणात अडकली. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी यामध्ये अडथळे आणले. न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला मशिदीच्या पुनर्बांधणीला परवानगी देण्याचे आदेश देऊनही परिस्थिती बदलली नाही.

मशिदीमुळे या भागात तणाव असल्याची कधीही नोंद नव्हती व पुढेही असणार नाही. अनेक हिंदू धर्मीय नागरिकांनी मशिदीच्या पुनर्बांधणीसाठी सहकार्य केले व त्यांचे या प्रक्रियेला समर्थन आहे. प्रार्थनास्थळ हा प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धेचा व अधिकाराचा विषय असतो. या मशिदी संदर्भात न्यायालयाने आदेश दिल्याने या अधिकारावर शिक्कामोर्तब झाले आहे. म्हणूनच या आदेशाचे पालन करणे हि मनपा प्रशासनाची व शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. या प्रक्रियेला समर्थन देणे हे आपल्या सर्वांचे एक संवेदनशील नागरिक म्हणून कर्तव्य आहे. यामध्ये सहभागी होऊन आपण या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन शांती दल करीत आहे.

रविवार, दिनांक १७ एप्रिल २०११
सायंकाळी, .३० वाजता
स्थळ: गांधीभवन, कोथरूड, पुणे.

वक्ते:
मा. भाई वैद्य, मा. उल्हासदादा पवार, मा. रमेश बागवे,
मा. वंदना चव्हान, मा. शांतीलाल सुरतवाला, मा. रशीद शेख इतर मान्यवर

अध्यक्ष:
डॉ. कुमार सप्तर्षी

निमंत्रक
अन्वर राजन संदीप बर्वे
कार्याध्यक्ष, शांती दल कार्यवाह, शांती दल
मोब. ९४२१० ५१६१७ मोब. ९८६०३८७८२७

Sunday, April 10, 2011

दिल्ली मानते त्याला कोन्ग्रेस वाले मानतात असा आजवरचा इतिहास आहे.

दिल्ली मानते त्याला कोन्ग्रेस वाले मानतात असा आजवरचा इतिहास आहे. आपला स्वार्थ साधला नाही तरच ते बंडखोरी करतात. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्येक आमदार निष्ठा वाहील यात शंका नाही. या ठिकाणी संत चोखामेळ्याचे उदाहरण घेता येईल. त्यांना विठ्ठलापर्यंत पोहचता येत नव्हते. पण मंदिराच्या पायरीवर माथा टेकला तरी आपला नमस्कार विठ्ठलाच्या पायापर्यंत पोहचतो अशी त्यांची श्रद्धा होती. तसे कोन्ग्रेसचे समस्त आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पायावर माथा टेकवतील आणि सोनिया गांधींचे पाय आहेत अशी श्रद्धा बाळगतील.

युक्रांदच्या सत्याग्रहाचा विजय - शिक्षण सेवकांच्या मागण्या मान्य

गेल्या १४ दिवसांपासून सेन्ट्रल बिल्डींग पुणे येथे शिक्षण सेवकांच्या न्याय मागण्यांसाठी सुरु असलेला सत्याग्रह यशस्वी झाला. शासनाने उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे आणि त्यांच्या गुंडांनी गुणवत्तेनुसार निवड झालेल्या शिक्षण सेवकांना सेवेत रुजू होऊ दिले नव्हते. बाहेरील जिल्ह्यातील शिक्षण सेवक नकोत अशी राज्यघटना विरोधी भूमिका घेतली होती. या जिल्हावादाच्या विरोधात १६४५ शिक्षण सेवकांसह युवक क्रांती दलाने बेमुदत व निर्णायक सत्याग्रह सुरु केला होता. सत्याग्रहाच्या १५ व्या दिवशी राज्य शासनाने सर्व शिक्षण सेवकांना सेवेत रुजू करून घेण्याचे मान्य केले.

संयम ठेवला तर अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने निश्चित यश मिळते यावरचा विश्वास अजूनही दृढ होत आहे. या सत्याग्रहात पाठींबा दिलेल्या सर्व नागरिकांचे, संघटनांचे आणि प्रसारमाध्यमांचे मनपूर्वक आभार!

Thursday, April 7, 2011

जन लोकपाल कायदा करण्याची जनतेची मागणी आणि अण्णा हजारेंचे उपोषण

युवक क्रांती दल, महाराष्ट्र या संघटनेचा प्रायोजित जन लोकपाल कायदा लोकसभेत संमत करावा या जनतेच्या मागणीला सक्रीय पाठींबा आहे.

उच्च पदस्थ मंत्री व नोकरशहा यांच्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्यास सरकारच्या लोकपाल कायद्यामध्ये तरतूद नाही. हि कवचकुंडले काढून घ्यावीत अशी आम जनतेची मागणी आहे. सरकारी कल्पनेनुसार लोकपालाने चौकशी करून फक्त सरकारकडे आपल्या शिफारशी पाठवाव्यात असे आहे. हि सरकारी विधेयकातील त्रुटी आहे . युक्रांदला ती अमान्य आहे. लोक्पालास त्याच्या निष्कर्षानुसार भ्रष्टाचारी उच्चपदस्थ मंडळींवर कडक कारवाई करता आली पाहिजे. तसेच लोकपालाने दाखल केलेल्या दाव्यात खटल्याची सुनावणी द्रुतगतीने झाली पाहिजे. जनालोकपाल कायद्यात या तरतुदी हव्यात.

वास्तविक लोकपाल बिलाची चर्चा १९६६ सालापासून सुरु झाली. या विषयाबाबत मा. मोरारजी देसाई यांचा जो आयोग नेमला होता, त्यांनी कायदा करण्याची शिफारस केली होती. आता तब्बल ४५ वर्षानंतर आता लोकपाल कायद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान आणि लष्करी दलांचे प्रमुख यांचा अपवाद करून अन्य कुणाही उच्च पदास्थावर सामान्य भारतीय नागरिकाला लोक्पालाकडे तक्रार अर्ज करून खटला भरता आला पाहिजे, अशी युक्रांदची भूमिका आहे. अपवाद केलेली पडे आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहेत. त्यांच्यावर अकारण चिखलफेक करणारे शत्रू राष्ट्रांशी लागेबांधे ठेवणारे भारतीय नागरिक असू शकतात.

वास्तविक पाहता जन लोकपाल कायदा संमत करण्यासाठी सत्तारूढ व विरोधी अशा सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. मा. अण्णा हजारे यांनी या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपले प्राण पानास लावले आहेत. त्यांच्या पुढाकाराने चालू झालेल्या जन आंदोलनास युक्रांद चा पाठींबा आहे. या प्रकरणात त्यांचे प्राणार्पण होऊ नये अशी आमची मनापासून इच्छा आहे.

युक्रांद व अभिनव युवा मंच तर्फे शुक्रवार दिनांक ८ एप्रिल २०११ रोजी दुपारी ठीक ०३.०० वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे जमून पदयात्रेने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. या पदयात्रेत सर्व युक्रांदीय व समविचारी स्त्री-पुरुष नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.